ग्रंथ संवाद !
ग्रंथ संवाद !
काल म्हणजेच ३१ जानेवारीला २०१६ ला निवारा सभागृहात ग्रंथ संवाद चा प्रकाशन सोहळा साजरा झाला. तो माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला प्रकाशन सोहळा होता. त्यामुळे नक्की काय काय असणार आहे ? या बाबत मला प्रचंड उत्सुकता होती. डॉक्टर न . म . जोशी आणि डॉक्टर अनिल अवचट यांना प्रत्यक्षात पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. त्याबाबत संगीता कुलकर्णी यांचे आणि बापट सरांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला गोखले सरांमुळे मिळाली त्यामुळे त्यांचे हि आभार .
डॉक्टर अनिल अवचट यांनी साहित्यात नव्याने शिरू पाहणाऱ्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे विपुल साहित्य वाचावे, जीवनात आलेले अनुभव स्वताचे आणि इतरांचे ह्यानेच लेखनाला स्फूर्ती मिळते. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या जवळ देखील जीवन जगण्याची कला असते. त्यांचे आयुष्य अनुभव समृद्ध असते. साहित्य हे केवळ अनुभव व त्यामुळे आलेले शहाणपण व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. अशी अनेक माध्यमे समाजात आहेत त्यांचा हि अनुभव घ्यावा हे सांगितले. त्यांच्या ह्या सांगण्याने नक्कीच नवीन लेखकांना नवीन दृष्टी मिळेल.
डॉक्टर न . म . जोशी यांचे देखील अनुभव असेच मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यांची डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्षात झालेली भेट आणि त्यांच्या जीवनावर पडलेला प्रभाव हि गोष्ट छान होती. तसेच माणसाजवळ नुसते ज्ञान असून उपयोग नाही त्याचा योग्य संधी साधून वापर केला पाहिजे . त्याच्या जवळ जिज्ञासा असली पाहिजे असे सांगितले . सातत्य आणि प्रयत्न यांमुळेच यश मिळते .
दोन्ही श्रेष्ठ लेखकांचे अनुभव ऐकायला मिळाल्याने खूपच छान आणि प्रसन्न वाटले.
डॉक्टर अनिल अवचट यांनी म्हणलेली आणि प्रेक्षकांनी देखील त्यांना साथ दिलेली प्रार्थना खूपच सुंदर होती. सामुहिक प्रार्थनेचा परिणाम मनावर ठसा उमटवून गेला .
पुन्हा एकदा ग्रंथ संवाद चे मनपूर्वक आभार !!!!
.
Comments
Post a Comment