जागतिक कविता दिन

आज २१ मार्च जागतिक कविता दिन. कविता या साहित्यप्रकाराचं ‘जतन’ आणि ‘संवर्धन’ करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. अगदी याच भावनेतून गेली एकोणीस वर्षं म्हणजे २००० सालच्या एप्रिलपासून ‘कुसुमाकर’ हे कवितेला प्राधान्य देणारं मासिक प्रकाशित होत आहे. भांडूप येथील कवी, लेखक, संपादक, प्रकाशक ‘श्याम पेंढारी’ हे याचे सर्वेसर्वा आहेत. नवोदित आणि प्रथितयश अशा दोन्ही कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे मासिक सुरु झालं ते एका काव्यमंचापासून. 

१९९५ साली पेंढारी सरांनी ‘काव्यगंध’ नावाचं मंडळ स्थापन केलं. कवींनी एकत्र येऊन आपापल्या कविता सादर कराव्यात, त्यांच्यावर चर्चा घडाव्यात, विचारांची, मतांची देवाणघेवाण व्हावी हा याचा उद्देश होता. साधारणपणे चार एक महिन्यांनी ते एखाद्या नामवंत कवीला बोलावून कवी संमेलनही भरवत असत. संमेलनाला कवींचा उत्तम प्रतिसाद मिळायचा. एकूण प्रवासात चारशे-पाचशे कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमांचं आयोजन सदस्यांच्या मासिक वर्गणीतून करीत असत. कवितेच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हा त्यांचा व्यासंग होता. या कामात त्यांना कवयित्री सीमा बिठाणे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवी भालेश साळवी, कवी बाळासाहेब तोरसकर, सिव्हील इंजिनिअर श्री. सुरेश धर्माधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.

कालांतरानं त्यांच्या लक्षात आलं की केवळ कवी संमेलन भरवून, कविता वाचून काही फारसा परिणाम घडत नाही. तर या सर्व कविता एकत्रित स्वरूपात आणि सातत्यानं लोकांच्या समोर आल्या पाहिजेत. मग याच उद्देशानं त्यांनी ‘कुसुमाकर’ हे मासिक सुरु केलं. मासिक चालू ठेवण्यासाठी त्यांना ज्यांच्या ज्यांच्या कडून सहकार्य अपेक्षित होतं ते तितकसं मिळायला अनेक अडचणी आल्या. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. मासिक चालूच ठेवलं. मात्र पुढं प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हे मासिक बंद करावं लागलं.

चांगल्या उद्देशानं केली जाणारी कृती कधीही वाया जात नाही किंवा अपयशी होत नाही हेचं खरं. सहा महिन्यानंतर कवितेविषयी आपुलकी असणाऱ्या काही रसिक कवींच्या आग्रहाखातर आणि त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानं हे मासिक पुन्हा सुरु करण्यात आलं. पण म्हणतात ना, बोले तैसा चाले ... असं जर घडलं असतं तर... आणखीन काय हवं होतं. अखेर अनेक अडचणींना तोंड देत मासिक चालू ठेवण्याची जिद्दच श्याम पेंढारी सरांची खरी सहाय्यक ठरली. आता मात्र काही झालं तरी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मासिक चालवण्याचा हा वसा सोडायचा नाही असा त्यांनी निश्चय केला. या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा आहे.

पेंढारी सरांनी एकुण अठरा पुस्तकं देखील प्रकाशित केली आहेत. ते स्वतः कविता आणि इतर लेखनही करतात. साहित्याच्या प्रेमापोटी स्वतःची पदरमोड करून तन, मन, धन अर्पण करून कुसुमाकर हे मासिक नियमितपणे चालवणाऱ्या श्याम पेंढारी सरांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. ते अतिशय नम्रपणे त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांचा मुलगा, पत्नी, मुलगी तसंच प्रिंटीग प्रेसवाला, डीटीपी ऑपरेटर आणि कवी, लेखक, वर्गणीदार या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

कविता ही जरी कवीची असली तरी ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे अनेक हातभार लागतातच. कविता दिनाच्या निमित्तानं या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज