अर्पण...

अर्पण...

संध्याकाळ ढळू लागली होती. पाखरं घरट्याकडे फिरकू लागली होती. दिवसभराचा शिणवटा आता वाऱ्याच्या झोतातुनही जाणवू लागला होता. घराघरात दिवे लागण झाली होती. रस्त्यावरची रहदारीही तशी मंदावलीच होती. नुकत्याच चांदण्या उमलू लागल्या होत्या. 

अशातच नेहमीचा घंटानाद झाला. अन् तो ऐकताच रमा मात्र अस्वस्थ झाली. तिच्याही नकळत तिची पावलं भराभर पडू लागली. जणूकाही भारावल्यासारखी ती चालू लागली. वळणवाटा सरावानं मागं पडत चालल्या होत्या. आता रहदारीही दुरावली. अन् सुरु झाला एक निःशब्द प्रवास...शांत, गूढ... एकाकी... 

पात्रातल्या खळाळत्या आवाजाची काय ती एक सोबत आणि मधूनच हळूहळू वाहणारा वारा. बस्स ! या चिरपरिचित वातावरणानं रमा उत्तेजित झाली. आता तर पावलांनाही ओढ जाणवू लागली होती. ऊरही भरून येऊ लागला होता. पाहता पाहता तिची प्रतीक्षा संपली. आणि ती मुक्कामी पोहोचली.

जणू काही जग जिंकावं इतका आनंद तिला झाला. हा क्षण... आपण पुन्हा पाहू शकू की नाही, अनुभवू शकू की नाही याबाबत ती साशंकच होती. पण अखेर आजही तिला हे सारं काही पाहायला, अनुभवायला मिळालं होतं. नियतीच्या या औदार्यापुढं ती नतमस्तक झाली.

भराभर पायऱ्या उतरून रमा नेहमीच्या पायरीवर जावून बसली. आणि नकळतच तिच्या पावलांनी त्या नदी पात्रातल्या पाण्याला गोंजारायला सुरुवात केली. जणू प्रदीर्घ काळानंतरची माय लेकराची भेट ... वात्सल्याची अतृप्त तहान ते दोघंही भागवू पहात होते.

मंदिरातला घंटानाद पुन्हा कानावर पडला तशी आपसूकच ती खाली झुकली. त्या नितळ पाण्यात तरंगणारं आपलं बिंब तिनं न्याहाळलं आणि अलवारपणे त्या पाण्यानं ओंजळ भरली. आता डोळ्यांनी मौन पाळणं पसंत केलं तर ओठांनी संवाद साधणं . तेव्हा हाताच्या ओंजळी सोबत पापण्यांचे काठही रिते रिते झाले.

मन शांत झालं. आत्मा तृप्त झाला. जे जे मिळालं ते सारं काही अर्पण झालं होतं. नदीचं पात्र आता अधिकच उचंबळून आलं होतं. रित्या हातांनाही कृतार्थ वाटलं. डोळे उघडले तर आता ते बिंब लाटेगणिक पुढं पुढं जात होतं. रमानं ते दृश्य नजरेत साठवून घेतलं. स्वतःच असं समर्पण बघताना तिची कोण समाधी लागायची.

घंटानाद स्थिरावला तेव्हा ती भानावर आली. स्तोत्र पठणाचे आवाज तिच्या कानावर यायला लागले. गाभारातल्या धूपानं सारं वातावरण मंत्रमय करून टाकलं.

आताशी पानांची सळसळही सुरु झाली होती. सोबतीला मातीचा मंद गंध तर मधूनच मोहवणारा तुळशीचा सुगंध अशा भारलेल्या वातावरणात रमा पुन्हा ध्यानस्थ झाली.

किती वेळ गेला ... कुणास ठाऊक, काही समजलं नाही. इवल्याश्या मासोळीच्या स्पर्शानं तीला वेळेची जाणीव करून दिली. एव्हाना चांदण्यांनी भरलेलं आभाळही काही संकेत देऊ पहात होतं. वृन्दावनातल्या डोलणाऱ्या त्या तुळशीकडे तिनं क्षणभर पाहिलं. सावळं बिंब हसल्याचा तिला भास झाला. जणू अंतरीची खूण तिनं जाणली.

असं ही सारं काही अर्पण करून तर झालं होतंच. आता पुन्हा दुसऱ्या मुक्कामी निघायचं. रित्या हातांनी, तृप्त मनानी.
तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज