ब्राह्मणी स्वयंपाक
credit- sahitysuchi magzine/rasik sahitya
ब्राह्मणी स्वयंपाक
(वसुधा गवांदे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई *पृष्ट्ये १९४ *मूल्य २७५/- )
"ब्राह्मणम भोजनम प्रियेत" असे गमतीने म्हणले जात असले तरी ते खरेच आहे. मध्यंतरी व्हाॅॅटसपवर पण "एका ब्राह्मण सुगरणीचे मनोगत" अशी पोस्ट आली होती. वाचून गंमत वाटली. त्यात ब्राह्मणांच्या भोजनात काय काय पदार्थ असतात, त्यांचा चौरस आणि पूरक आहार, त्याची विशिष्ट प्रकारे
पण विचारपूर्वक केलेली मांडणी अशी माहिती होती. यानंतर "ब्राह्मणी स्वयंपाक" वसुधा गवांदे यांचे पुस्तक वाचनात आले. सुरवातीला वाटले खाद्य संस्कृतीला जागतिकीकरण अंगवळणी पडले असताना, घरोघरी सर्रास पिझ्झा, बर्गर, हक्का नूडल्स यांचे स्थान असताना हे ब्राह्मणी भोजनाचे पुस्तक का बरे काढले असावे ? रोजची भाजी पोळी दोन वेळा जेवताना खाणे हेच सध्या कालबाह्य ठरत आहे. न्याहारी, दुपारचे जेवण, मधल्यावेळचे खाणे आणि पुन्हा रात्रीचे जेवण अशा प्रकारे आपण दिवसभरात अन्नग्रहण करत असतो. प्रत्येक वेळी आपल्याला जिभेचे चोचले पुरवणारे नवेनवे पदार्थ हवे असतात. या गरजेतून पाककृतींची असंख्य पुस्तके निर्माण झाली आहेत. तरीही हे पुस्तक नक्की काय सांगत या उत्सुकतेने ते वाचायला सुरवात केली. प्रस्तावनेतील प्रख्यात शेफ संजीव कपूर यांचे खाद्य संस्कृतीबाबतचे विचार वाचल्यावर या पुस्तकाचे महत्व जाणवले.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात तूप करणे, दह्याचे विरजण लावणे, साखरेचा एकतारी/ गोळीबंद पाक तयार करणे, स्वयंपाकापूर्वीची तयारी, फोडणी देण्याची पद्धत, मसाले तयार करण्याची पद्धत, पान वाढण्याची विशिष्ट पद्धत या साऱ्याची माहिती दिली आहे. आपल्याला फारशा परिचित नसणाऱ्या भाज्याही यात आहेत
त्या कशा कराव्यात, निवडाव्यात यांची माहिती सांगितली आहे. जसे कोरोळ्याच्या भाजीची पानं आपट्याच्या पानासारखी दिसतात वा भारंगीची भाजी घेताना त्याची कोवळी पाने घ्यावीत. तसेच सणासुदीच्या स्वयंपाकाची तयारी कशी करावी? याबाबत टीपही दिली आहे. उदाहरणार्थ पुरणपोळीसाठीचे पुरण आदल्यादिवशी शिजवावे. उकडीचे मोदक करताना पारी फुटू नये
म्हणून काय करावे अशा अनेक स्वयंपाक घरातल्या निरनिराळ्या सहज सोप्या क्लुप्त्या
या पुस्तकात सांगितल्या आहेत. वाळवणाचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या
भाजण्या, पिठ ही कशी तयार करावीत त्यांची साठवणूक कशी करावी ? आमटीमध्ये फोडणी करताना लोखंडी कढई वापरावी, तसेच
आटवणी म्हणजे काय ? भात किंवा पुलाव यासाठी तांदूळ कसा
निवडावा ? कुठली भाजी कोणत्या ऋतूत चांगली मिळते? प्रवासात नेण्यासाठी पदार्थ करायचा झालास काय काळजी घ्यावी? यासारख्या माहितीमुळे नव्याने पाककृती करणाऱ्या व्यक्तीला तिचा फायदा
निश्चितच होईल.
यातील पदार्थ आणि त्याची कृती इतक्या
सुटसुटीतपणे सांगितली आहे की आपल्या धावपळीच्या काळातही कोणीही ते पदार्थ सहज करू
शकत. मसाल्यांचा कमीतकमी वापर, तसेच कांदा, लसूण यांचाही मर्यादित वापर
हे यातील भाज्यांचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. यातील बरेच पदार्थ हे पारंपारिक
गणले जातील असे आहेत पण त्यांची कृती आणि त्यातील पौष्टिक मूल्ये पाहता आजच्या
आहार नियमन करण्याच्या काळात ते फारच उपयुक्त ठरणारे आहेत. उपवासाचे पदार्थही यात
सांगितले आहेत. बदलत्या काळाप्रमाणे मायक्रोव्हेवचा वापर कसा करता येईल तेही
सांगितले आहे. एकंदरीत आधुनिकता आणि परंपरा यांची सांगड
घालणारे ब्राह्मणी स्वयंपाक हे पुस्तकं रसना तृप्ती करणारे आहे.
Comments
Post a Comment